हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 10 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड
जिल्हयात तर दिनांक 11 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली जिल्हयात तर
दिनांक 12 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक
13 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड,
परभणी जिल्हयात तर दिनांक 14 जूलै रोजी धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड,
परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 जूलै 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान
सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
किंचीत जास्त तर दिनांक 17 ते 23 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान
सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचिंत जास्त राहण्याची शक्यता
आहे.
मराठवाडयातील जालना जिल्हयातील परतूर तालूक्यातील (जामसमर्थ) : छत्रपती
संभाजी नगर जिल्हयातील सिल्लोड तालूक्यातील (अजंठा) गंगापूर तालूक्यातील (वाळूंज)
सोयगाव तालूक्यातील (बनोती) इत्यादी महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी
पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य मौसमी पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी
करावी.
संदेश : शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायी
जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क
घालूनच करणे गरजेचे आहे. कापूस पिकामध्ये शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी
दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. केळी,
आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी झाडाखाली दाणेदार
मेटाल्डिहाईड प्रति झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची
पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व
जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. पाऊस झालेल्या
ठिकाणी उगवून आलेल्या सोयाबीन पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत.
सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
खरीप ज्वारी पिकात
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या
खरीप ज्वारी पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. जुलैच्या पहिल्या
आठवडयानंतर खरीप ज्वारी हे पिक घेऊ नये.
पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया
करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून
आलेल्या बाजरी पिकात विरळणी व नांग्या भरणे ही कामे करून घ्यावीत. बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा
प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून
नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या
अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या
व्यवस्थापनासाठी मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी
तसेच रासायनिक व्यवस्थापनकरिता क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस
36 टक्के 200 मिली प्रति एकर फवारावे.
हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फुलधारणा व फळधारणा अवस्थेत
असल्यामूळे, पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व कोणत्याही किटकनाशकाची
फवारणी करू नये. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
मृग बहार डाळींब बागेत फुलधारणा व फळधारणेच्या अवस्थेत असल्यामूळे,
पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व बागेत रोगाचा प्रादूर्भाव होण्याची
शक्यता पाहता 1 % बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
चिकू बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे व अंतरमशागतीची
कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या
जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड
करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाउला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले
असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची,
टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून
घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे व अंतरमशागतीची
कामे करून तण नियंत्रण करावे.
फुलशेती
पाउस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून
घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे व अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे.
पशुधन व्यवस्थापन
ओलसर व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव
वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी
खालील उपाययोजना कराव्यात : जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व
गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी,
गोठयामध्ये मूबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात
दूभत्या जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून
काढावे. पावसाळयात मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात
जनावरांना कोवळा, हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 29/2026-2027 शुक्रवार,
दिनांक –
10.07.2026
No comments:
Post a Comment