Friday 21 April 2023

दिनांक 21 एप्रिल रोजी हिंगोली, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दिनांक 25 एप्रिल रोजी जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 21 एप्रिल रोजी हिंगोली, परभणी, लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 एप्रिल रोजी लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात तर दिनांक 25 एप्रिल रोजी जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 28 एप्रिल ते 04 मे 2023 दरम्यान पाऊस किंचित सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 एप्रिल ते 02 मे 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

शेतकरी बांधवांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून "मेघदूत" अँड्रॉइड अॅप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट इ.च्या अंदाजासाठी "दामिनी" अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वाढलेले बाष्पोत्सर्जन व कमाल तापमानामूळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. नविन लागवड केलेलया हंगामी ऊस पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वादळी वारा व पाऊस यामूळे पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. छाटणी नंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वाढलेले बाष्पोत्सर्जन व कमाल तापमानामूळे अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेस, डाळींब व चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस ताण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. डाळींब बागेतील सर्व नुकसानग्रस्त फळे काढून, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि बागेबाहेर खड्डयामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर 10 % बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोस देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या बहाराची तयारी करावी. गारपीट व पावसामूळे ईजा झालेल्या फळांची काढणी करावी आणि फळे कुजलेली दिसत नसल्यास त्यांची तत्काळ विक्री करावी. चिरलेली व नुकसानग्रस्त फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्डयात टाकावीत. फळांच्या काढणीपूर्वी बोरीक ॲसिड 2 ग्रॅम प्रति लिटरची संरक्षणात्मक फवारणी घ्यावी जेणेकरून ईजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. वाढलेले बाष्पोत्सर्जन व कमाल तापमानामूळे चिकू बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. चिकू बागेत पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना आधार द्यावा. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी करून घ्यावी. वादळी वारा व पाऊस यामूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.

 

 

 

चारा पीके

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा.

भाजीपाला

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. वाढलेले बाष्पोत्सर्जन व कमाल तापमानामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

अक्षय तृतीयामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुलपिकात पाण्याचा ताण बसत असल्यास सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मुबलक प्रमाणा हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणवठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरावयास सोडावे.

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनी काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक संगोपन दुसऱ्या वर्षापासून करणे सोयीचे ठरते. पहिल्या वर्षात तुती झाडे एक काडीवर असल्याने कमी तुती पाने खाद्य मिळते. दुसऱ्या वर्षापासून वर्षाला 5 ते 6 कोषाची पीके घेण्यासाठी आवश्यक 18 ते 20 टन प्रति एकर पानाचे उत्पादन सुरू होते. शंभर अंडी पुंजासाठी 1000 चौ.फुट चटई क्षेत्र या प्रमाणे रॅकवर जागा लागते. दुसऱ्या वर्षापासून एकरी 250 ते 300 अंडीपुंज एक वेळा घेता येतात व त्यासाठी 3 टन तुती पाने व दुप्पट फांद्या तुती खाद्य लागते. उच्च प्रतीच्या तुती पाने उत्पादनाचा यशस्वी कोष उत्पादनात 38 टक्के वाटा आहे. त्यामूळे प्रति वर्ष शिफारसीत खत 20 मे.टन/हेक्ट र व गांडूळ खत 5 टन/हेक्टर देणे आवश्यक आहे.

कुक्कुट पालन

तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे कोंबडया व लहान पिल्ले सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक06/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक 21.04.2023

 


No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...