हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 जून रोजी लातूर, धाराशिव जिल्हयत तर
दिनांक 26 जून रोजी बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून
मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर
दिनांक 25 जून रोजी बीड जिल्हयात तर
दिनांक 26 जून रोजी धाराशिव, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी ठिकाणी वादळी
वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मध्यम पावसाची
शक्यता आहे. दिनांक 23 जून रोजी जालना,
परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 24 जून रोजी धाराशिव, लातूर, बीड,
जालना, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तर दिनांक 25 जून रोजी छत्रपती संभाजी नगर,
नांदेड जिल्हयात तर दिनांक 26 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी,
हिंगोली, नांदेड जिल्हयात तर दिनांक 27 जून रोजी धाराशिव, लातूर जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते
मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 23, 24, 25 व 27 जून रोजी काही ठिकाणी
तर 26 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 3 ते 4 अं. से. ने घट होण्याची तर
किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 26 जून ते 02 जूलै 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयातील नांदेड जिल्हयातील
मुखेड तालूक्यातील : बऱ्हाळी व मुक्रामाबाद महसूल मंडळ, किनवट : शिवनी मसहूल मंडळ
तर लातूर जिल्हयातील अहमदपूर तालूक्यातील : हडोळती महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी
पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
संदेश : शेतकरी
बांधवांनी पेरणीयोग्य मौसमी पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकाच्या लागवडीसाठी
वाण निवडताना जमिन व हवामान,
कोरडवाहू किंवा बागायती, लागवडीचा प्रकार
व वाणांचे गुणधर्म यांचा विचार करून
वाणांची निवड करावी. बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस +
सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस +
मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते. कापूस
बियाण्यास सुडोमोनास फ्ल्युरोसन्स 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेंडेझीम 3 ग्रॅम प्रति किलो
बियाणे याप्रमाणात बिज प्रक्रिया करावी. यामूळे मर व करपा यासारख्या रोगांचा
प्रादूर्भाव कमी होतो. नत्र स्थिरीकरणासाठी ॲझॅटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य करणारे
जिवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.
तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी
तुर + बाजरी (2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण
ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. पेरणीपूर्वी तूर
बियाण्यास कॅप्टान 80 टक्के 20 ग्रॅम किंवा कार्बेंन्डॅझिम 10 ग्रॅम प्रति किलो
बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम आणि
स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10
किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. कोरडवाहूसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ.
बियाणे तर बागायती टोकन पध्दतीने लागवडीसाठी 5 ते 6 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे
वापरावे.
आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे, ते
या पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून
घेता येतात. मूग/उडीद पेरणीपूर्वी बियाण्यास 1 ग्रॅम कार्बेंन्डॅझिम किंवा 2 ग्रॅम
थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच
ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक
रायझोबियम व पीएसबी 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति 10 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी. पेरणीसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ. बियाणे वापरावे.
भुईमूग पिकाच्या
लागवडीसाठी एसबी-11, जेएल-24, एलजीएन-2 (मांजरा), टीएजी-24, टीजी-26, टीएलजी-45,
एलजीएन-1, एलजीएन-123 इत्यादी वाणांचा
वापर करावा. भुईमूग पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 75 टक्के किंवा कार्बोक्झीम 37.5 टक्के + थायरम 37.5
टक्के 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम 12 टक्के + मॅन्कोझेब 63 टक्के 2.5 ग्रॅम प्रति
किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 200 कि.ग्रॅ. उपटया
तर 80 कि.ग्रॅ. पसऱ्या जातीचे बियाणे वापरावे.
मका पिकाच्या पेरणीसाठी
नवज्योत, मांजरा, डीएमएच-107, केएच-9451, एमएचएच, प्रभात, करवीर, जेके-2492,
महाराजा, यूवराज इत्यादी वाणांचा वापर करावा. मका पिकास पेरणीपूर्वी
सायॲन्ट्रानिलीप्रोल 19.8% + थायामिथॉक्झाम 19.8% एफएस 6 मिली प्रति किलो
बियाण्यास बिजप्रक्रिया करावी या बिजप्रक्रियेमूळे पेरणीनंतर 15 ते 20 दिवसापर्यंत
पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते. बियाण्यास थायरम 2 ते 2.5 ग्रॅम
तसेच ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. केळी बागेत घड वाढीसाठी
बागेत 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर),
श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर
मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. नविन
लागवड केलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा.
आंबा बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणी केलेल्या आंबा
बागेतील रोगग्रस्त व वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. ढगाळ वातावरणामूळे आंबा
बागेत पर्णगूच्छ रोगाची समस्या लक्षात घेता, पावसाळ्यात आवश्यकतेनूसार दोन ते तीन
वेळा रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर,
पायरी, तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन
मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत
रोगग्रस्त पाने काढून टाकावीत व शेंडा खूड करून घ्यावी.
सिताफळ बागेत खत व्यवस्थापन करावे. नविन सिताफळ बाग लागवडीसाठी
बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी
शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला पिकाची लागवड करून घ्यावी व
गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या
लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी टाकून रोपे तयार करावी. काढणीस तयार असलेल्या
फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
उन्हाळयातील उष्ण तापमान संपूण अचानक झालेला वातावरणातील बदल, ओलसर
व दमट वातावरणामूळे जनावरांमध्ये रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते.
त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात :
जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची
काळजी घ्यावी. गोठयातील आर्द्रता व दमटपणा कमी होण्यासाठी, गोठयामध्ये मूबलक
प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दूभत्या जनावराची कास
पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे. पावसाळयात
मूख्यत: जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात जनावरांना कोवळा,
हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 24/2026-2027 मंगळवार,
दिनांक –
23.06.2026