Tuesday, 25 June 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 25 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 26 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 27 जून रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 28 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 29 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 25 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 26 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 27 जून रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 28 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 29 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 28 जून 04 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 जून ते 06 जुलै 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, हिमायतनगर, उमरी, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश + 20 किलो ग्रॅम गंधक खताची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा शिफारस केली आहे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी  जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. बाजरी पिकास हलक्या जमिनीत 40:20:20 व मध्यम ते भारी जमिनीत 60:30:30 पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी नविन संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेची लागवड करावी. नवीन संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी  जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी.  काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

मका या चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पीपीआर या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.

तुती रेशीम उद्योग

प. बंगाल राज्यातून स्‍थलांतरीत झालेली व कर्नाटक, आंध्र प्रदेशात हाहाकार माजवत असलेली व रेशीम कीटकावर प्रादूर्भाव करणार किड उझी माशी सन 2018 पासून महाराष्ट्रातील जालना, बीड, लातूर व परभणी जिल्हयात रेशीम कोष पिकाचे 20 ते 30 टक्के नुकसान करत असल्याचे अढळून आले आहे. भारतात 80 टक्के कच्चे रेशीम कीटक संगोपनगृह असून महाराष्ट्र राज्यात 98 टक्के कच्चे शेडनेट गृहच रेशीम कीटक संगोपनासाठी शिफारस करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी हळूहळू 1 ते 1.5 एकर तुती बागेसाठी पक्के संगोपनगृह बांधुन घ्यावीत म्हणजे रेशीम कोष उत्पादनात सातत्य आणि शाश्वतता टिकून राहील. उझी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाने साठवण गृह (अंधार खोली) ॲन्ट रूम असावी. सरळ तुती फांद्या संगोपनगृहात नेवून खाद्य न देता अंधार खोलीत 2 तास ठेवून नंतर खाद्य द्यावे.

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

कृषि अभियांत्रिकी

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक25/ 2024- 2025    मंगळवार, दिनांक – 25.06.2024

 

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...