प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयातील बीड, लातूर व उस्मानाबाद
जिल्हयात दिनांक 05 नोव्हेंबर रोजी तूरळक
ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40
किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील 48 तासात किमान तापमानात फारशी तफावत न होता, त्यानंतर
किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस
सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
बागायती हरभरा पिकाची पेरणी
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. बियाणे कमी खोलीवर (5 सें. मी.)
पेरावे म्हणजे फांद्या, फुले व घाटे यांची जोमदार वाढ होते. बागायती पिकासाठी दोन
ओळीतील अंतर 45 सें.मी. व दोन रोपांतील अंतर 10 सें.मी. ठेवावे.बागायती गहू वेळेवर
पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते.वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकाची
पेरणी करुन तीन आठवडे झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.पूर्व हंगामी ऊसाची लागवड
15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पूर्व हंगामी ऊसात पानकोबी, कांदे, बटाटे अंतरपीक
घेतल्यास प्रति हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन व अतिरिक्त निव्वळ नफा मिळतो.हळद
पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15
दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 %
10 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद
पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत
संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी
अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली +
5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा
प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा
प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15
दिवसांच्या अंतराने करावी. रसशोषणाऱ्या पतंगामूळे होणारे नूकसान टाळण्यासाठी
फळांना पॉलिप्रोपीलीन नॉन ओव्हन किंवा बटर पेपर बॅगने झाकावे. झाकण्यापूर्वी तेलकट
डागासाठी, पिठया ढेकून किंवा बागेतील किडींचा प्रादूर्भाव विचारात घेऊन योग्य
जिवाणू नाशकाची, किटकनाशकची आणि बूरशीनाशकाची फवारणी करावी.नविन लागवड केलेल्या
चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे.
भाजीपाला
पुर्नलागवडीस केलेल्या भाजीपाला पिकास
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून
बाजारपेठेत पाठवावी.
फुलशेती
सध्या दीपावली सणामुळे बाजारपेठेत
फुलांना अधिक मागणी आहे त्यामूळे आवश्यकतेनूसार फुलांच्या तोडणीचे नियोजन करावे.
चारा पिके
रब्बी हंगामात ज्वारी, ओट, बरसीम, लसूण
घास इत्यादी चारा पिकांची लागवड करावी.
तुती रेशीम उद्योग
यशस्वी कोष उत्पादनासाठी तुती पाने
उत्पादनाचा मोठा 38% वाटा असून संगोपन गृहातील हवामान म्हणजे तापमान 22 ते 28 अंश सेल्सियस व
आर्द्रता 80 ते 85% असणे आवश्यक आहे. दूसऱ्या व तिसऱ्या
वर्षात 5X3X2 फुट अंतरावर किंवा 6X2X2 फुट
केलेल्या लागवडीत तुट राहणार नाही याची काळजी घ्यावी. तुटीमध्ये तुतीचे बेणे लागवड
करणे यशस्वी राहत नाही. म्हणून तुट भरून काढण्यासाठी लहान तुती रोपे लावावीत. तुती
रेशीम किटकाचे आवडते खाद्य म्हणजे तुती होय. म्हणून तुती पानावर भुरी रोग (पांढरे
डाग) आल्यास बूरशीनाशक कार्बेन्डेझीम 0.2% म्हणजे 20 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 5 ते 6 दिवसांनी किटकास पाने खाद्य
म्हणून द्यावे.
सामुदायिक विज्ञान
शरीरातील सर्व कामे व्यवस्थीत
करण्याकरिता व आपल्या ऱ्हदयाचे ठोके व्यवस्थीत राहण्यासाठी मिठाची गरज असते.
मिठामूळे चव चांगली येते पण मिठाचा वापर करावा. कारण जास्त मिठाचा वापर केल्याने
रक्तदाब, ऱ्हदयरोग होतात. जासत मिठामूळे हाडातील कॅल्शीयमचे शोषण होते. जागतिक
आरोग्य संघटना यांनी 5 ग्रॅम पेक्षा कमी मिठाचा वापर करावा असे सूचविले आहे.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 63/2021
- 2022 शुक्रवार, दिनांक - 05.11.2021
No comments:
Post a Comment