प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चोविस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही
व त्यानंतर पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची
शक्यता आहे. दिनांक 31 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 31 मार्च ते 06 एप्रिल 2023 दरम्यान व दिनांक 07 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते
सरासरीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11
एप्रिल 2023 दरम्यान कमाल व किमान
तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता
आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उन्हाळी तीळ पिकामध्ये फुले येण्याची
अवस्था व बोंडे धरण्याची अवस्था या सिंचन देण्यासाठी संवेदनशील अवस्था आहेत. या
अवस्थेत पाणी कमी पडल्यास उत्पादनात घट येते. मध्यम जमिनीत 8-10 दिवस व भारी जमिनीत 12-15 दिवसाच्या अंतराने सिंचन द्यावे.
सिंचन हे सकाळी किंवा संध्याकाळी शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने द्यावे. काढणी
केलेल्या करडई पिकाची मळणी करून घ्यावी. मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या व काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी करावी.
सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश
करणे ही कामे करून घ्यावी. कमाल तापमानात
झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे ऊस पिकास आवश्यकतेनूसार सकाळी
किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व
जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी फळझाडाच्या आळयात आच्छादन
करावे. बागेस सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन
पध्दतीचा अवलंब करावा. काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची
काढणी करून घ्यावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित
राहण्यासाठी डाळींब फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून
घ्यावी.
भाजीपाला
काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची
तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ व
वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील
ओलाव्यानूसार पाणी द्यावे. पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. पाणी
देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा (तूषार किंवा ठिबक) वापर करावा.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून
बाजार पेठेत पाठवावी. कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार व जमिनीतील ओलाव्यानूसार पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका
(निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा
शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस
पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार
नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25
ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण
दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति
उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने भिजवून ठेवावे.
तुती रेशीम उद्योग
तुती बागेत तुती लागवडीनंतर जून
महिन्यात छाटणी करावी लागते. तुती लागवड पट्टा पध्दत (5X3X2 फुट) किंवा (6X3X2
फुट) असेल तर तुली छाटणी फांद्या खाद्य काढणे, वाहतूक खत टाकणे
सोईचे होते आणि सरी पध्दत लागवडी पेक्षा तुती पानाचे उत्पादन जास्त मिळते उदा.
व्हि-1 जातीचे वर्षाला 65 ते 70 मे. टन एवढे पानांचे व फांद्याचे दुप्पट उत्पादन
मिळते. जमिनीपासून 1.25 ते 1.50 फुटावरून छाटणी करावी आणि सव्वा ते दिड फुटापर्यंत
एकच झाड (वृक्ष) एकाठिकाणी राहिल याची काळजी घ्यावी. जमिनीलगत म्हणजे प्रत्येक
वर्षा खरड छाटणी करू नये. त्यामुळे काहि वर्षानंतर एका ठिकाणी 25 ते 50 शुट निघतात
आणि पानाची प्रत खालावते. दुसऱ्या वर्षापासून प्रत्येक 1.5 महिन्याला छाटणी करून
वर्षाला 8 ते 9 कोषाचे पिके घेता येतात.
सामुदायिक विज्ञान
स्वस्थ जीवनासाठी आश्यक बाबी : दररोज
संतुलीत आहार घ्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या. आहारात साखर आणि मीठाचा वापर कमी करा. तेल आणि
मसालेदार पार्थांचा वापर कमी करा. सकाळची न्याहरी करण्यास कधीच टाळाटाळ करु नका.
जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळा.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 105/2022
- 2023 शुक्रवार,
दिनांक –
31.03.2023
No comments:
Post a Comment