प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 3 ते 4 दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची
शक्यता आहे. मराठवाडयात नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 22 मे रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 19 ते 25 मे 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरी पेक्षा कमी व दिनांक 26 मे ते 01 जून 2023 दरम्यान कमाल
तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 24 ते 30 मे 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या
जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त
आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन
लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या
प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे. खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम
निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामु 5.5 ते 8.4 पर्यंत असावा. बाजरी या पिकाच्या
पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. अडसाली ऊस
लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (60 ते 120 से. मी.) जमिन निवडावी.
पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद
लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन
निवडावी, तसेच जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा अशी बहू वार्षिक तणे असू नयेत. जमिनीत
पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते
7.5 असलेल्या जमिनीत हळदीचे पिक उत्तम येते. सध्याच्या काळात हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून
घ्यावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल
भारी उत्तम निचऱ्याची व 1 मी. खोलीची चांगली जमिन निवडावी. अतिआम्ल तथा क्षारयूक्त, चुनखडीयुक्त जमिन
निवडू नये. सध्या आंबे बहार संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता
घ्यावी तसेच फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी व जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी
सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. डाळींब
लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिन निवडावी. जमिनीचा सामू
6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा. चिकूच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची खोल, मध्यम
काळी जमिन निवडावी, चुनखडीयुक्त जमिनीची निवड करू नये.
चारा पीके
खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या
लागवडीसाठी मध्यम, बाजरीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची
निवड करावी.
भाजीपाला
खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो,
कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन
निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची
काढणी करून घ्यावी.
फुलशेती
खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम
ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.
तुती रेशीम उद्योग
पलटी नांगराच्या साहाय्याने जमिनीची
नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी. जमिन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन/हे. शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर
महिन्यात खत देऊन हलके पाणी द्यावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन/हे. म्हणजे दोन टन/एकर दोन समान हप्त्यात द्यावे. तूती लागवडीसाठी तूती रोप
वाटीका 3 आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन
महिने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोप वाटीका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर शेतात रोपे
लागवड करावी. जून
ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तूती लागवड करता येते.
सामुदायिक विज्ञान
दोन टक्के आवळयाच्या पानाच्या अर्काचा
वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ
प्रतिबंघित करता येते. आवळयाच्या पानाच्या अर्कासह 6 % सीट्रिक ॲसिड घेऊन सुती
कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सुक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा
प्रतिबंध कापडाच्या पाच धुण्यानंतर कमी
झाल्याचा आढळून आला. आवळयाच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्टयपूर्ण
कपडयांना उदा. अवगुंठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पटृटया यावर
केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.
कृषि
अभियांत्रिकी
शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून
घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट होईल.
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी
जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 14/2023
- 2024 शुक्रवार, दिनांक – 19.05.2023
No comments:
Post a Comment