प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी
तफावत जाणवणार नाही. दिनांक 17 जून
रोजी नांदेड, उस्मानाबाद, लातूर
जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 16 ते 22 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला
आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 18 ते 24 जून 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा
जास्त व
किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा
कमी राहण्याची शक्यता आहे.
दिनांक 13 ते 16 जून, 2023 दरम्यान तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
बीटी
कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस + सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद
ओळींमध्ये कापूस + मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास
फायदेशीर ठरते. तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी
तुर + बाजरी (2:4), तुर + ज्वारी (3:3 किंवा 2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2
किंवा 2:4) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक
फायदा होतो. आंतरपीक म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे, ते या
पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता
येतात. भुईमूग पिकात भूईमूग + तूर (4:2) किंवा भुईमूग + तीळ (4:2) किंवा भूईमूग +
एरंडी (4:1) याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. मका पिकात मका + तूर (4:2) किंवा मका + उडीद (2:1)
या प्रमाणे आंतरपीक घ्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन
केळी, आंबा व सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती
पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी
करावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. केळी, आंबा द्राक्ष व सिताफळ बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी, आंबा द्राक्ष व सिताफळ बागेत
ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष
बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश
डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते.
भाजीपाला
पाण्याची
उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार
करण्यासाठी बी टाकले नसल्यास टाकून घ्यावे. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी
आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची
लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान
झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
पाण्याची
उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी
टाकून रोपे तयार करावी. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार
झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस
तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळा
ऋतुच्या आगमनासोबतच अनेक आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी
त्रिसुत्री 1) भौतीक सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून
संरक्षण. 2) जैविक सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा
म्हणजे आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली
औषधोपचार लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच
तात्काळ शेळी मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची
जंतनाशकाची मात्रा आवश्यक ठरते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास
खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती
अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मधूमेह
असणाऱ्या व्यक्तींनी रोजच्या आहारात तंतूमय युक्त अन्न पदार्थांचा जसे की, भगर,
बाजरी, नाचनी, राजमा, चवळी, मटकी, सोयाबीन, मेथीची भाजी, राजगिऱ्याची भाजी आणि
शेवग्याची पाने यांचा वापर करावा. त्यामूळे रक्तातील वाढणारी साखर नियंत्रित
राहण्यास मदत होते.
ईतर
शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी
सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात
कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 21/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 13.06.2023
No comments:
Post a Comment