हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 27 ऑक्टोबर रोजी तूरळक
ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 28 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व
नांदेड जिल्हयात तर दिनांक 29 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी,
हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा
कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात
फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे तर पुढील दोन
दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अं.से ने घट होऊन त्यानंतर 2 ते 3 अं.से ने वाढ
होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 25 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी व कमाल तापमान सरासरीएवढे तर
दिनांक 01 ते 07 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
जास्त व कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : मराठवाडयातील
अनेक भागात परतीचा पाऊस पडल्यानंतर सूप्तावस्थेतील शंखी गोगलगायी आढळून येत आहेत,
त्यामूळे फळबागेत व पिकामध्ये गोगलगायीचा प्रादूर्भाव वाढून नूकसान होऊ शकते
त्याच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी
गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट
कराव्यात. पिकामध्ये
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार मेटाल्डिहाईड 2 किलो प्रति एकर या
प्रमाणात शेतात पसरून द्यावे व बागेत झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड 100
ग्रॅम पसरून टाकावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या सोयाबीन पिकाची
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी.
पुढील हंगामात बियाण्यासाठी
सोयाबीनचा वापर करण्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण 14 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 400
ते 500 आरपीएम तर आर्द्रतेचे प्रमाण 13 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 300 ते 400
आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता
येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे
जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस
पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30
% 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ
शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या
पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल
11.4% (पुर्वमिश्रित
बुरशीनाशक) 10 मिली
+ 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर
पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास हरभरा पिकाची पेरणी लवकरात
लवकर करून घ्यावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिला आठवडया पर्यंत
करता येते. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45 X 10 सेंमी अंतरावर करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो
नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. पेरणीपूर्वी
मर रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम
प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. तर मूळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी
ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम किंवा थायरम 3
ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची
उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून
घ्यावी. बागायती करडई पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी 45 X 20 सेंमी अंतरावर करावी. बागायती
करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो
स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व 30 किलो
नत्र एक महिन्यानी द्यावे. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता
असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून
घ्यावी. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करून घ्यावी. पेरणी
45X15 सेंमी
अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग
प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया
करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48%
14 मिली प्रति किलो
बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी
जिब्रॅलिक ॲसिड (15 पीपीएम) 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून
पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड (15 पीपीएम) 1.5 ग्रॅम प्रति 100
लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
भाजीपाला
रब्बी हंगामात ब्रोकोली, टोमॅटो,
फुल कोबी व पत्ता कोबी या भाजीपाला पिकाचे गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी
टाकावे तर मुळा, गाजर, मेथी व पालक ईत्यादी पिकाची लागवड करून घ्यावी.
फुलशेती
आष्टूर व जिलार्डीया या
फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब
दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी
करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम किटक संवेदनशिल किटक असून
34 अं.से. च्यावर आणि 15 अं.से. तापमानाखाली तुती पाने खात नाहीत म्हणून
संगोपनगृहात तापमापी व आर्द्रता यंत्र असणे गरजेचे आहे. 10 टक्के किंवा त्या
पेक्षा कमी तुती पाने वाळली असतील तर रेशीम किटक ते खात नाहीत, त्यांना उपवास
घडतो. दोन फांद्या खाद्य दिल्यानंतर ते हवेने सुकू नये म्हणून निळ्या रंगाचे
सच्छिद्र पॉलीथीन रॅकवर अच्छादन म्हणून टाकावे. परिपक्व अळ्यांची वाढ झाल्यानंतर
50 टक्के पर्यंत कोष करायला लागल्यानंतर प्लास्टीकच्या चंद्रिका टाकाव्यात व
त्यावर वर्तमान पत्राचे अच्छादन करावे, म्हणजे रेशीम किटक धागा वाया घालत नाहीत.
पशुधन व्यवस्थापन
पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये
यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास)
स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन
करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे.
ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.
जेणेकरून चारा टंचाईच्या काळात सदरील चारा जनावराच्या खाद्यासाठी वापरता येतो.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 60/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 25.10.2024
No comments:
Post a Comment