हवामान
सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्ण आणि दमट
वातावरण राहून तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते
50 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर जालना, बीड, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी उष्ण आणि
दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी नांदेड, लातूर, बीड, परभणी व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर नांदेड,
लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 27 एप्रिल रोजी धाराशिव, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग
अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून
हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस
तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर त्यानंतर चार दिवस हळूहळू 3 ते 4 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.तर पुढील दोन
दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही तर त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से.
ने घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य
सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 25 एप्रिल ते 01 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 02 ते 08 मे 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या
जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला
आहे.
संदेश
: कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या
बाष्पोत्सर्जनाचा वेग पाहता, पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार
पाणी व्यवसापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी
येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण
करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव
दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या सध्या हळदीची काढणी,
हळद उकडणे, वाळवणे ही कामे सुरु असून पावसाचा अंदाज पाहून हळदीची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. उन्हाळी तीळ पिकास
मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन
करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे. उन्हाळी तीळ पिकात रसशोषण
करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 %
निंबोळी अर्काची पावसाची
उघाड बघून फवारणी करावी.
फळबागेचे
व्यवस्थापन
कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे सध्या आंबे बहार
संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी संत्रा/मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी व बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. अंबे
बहार संत्रा/मोसंबी बागेत 00.52.34 @ 1.5 किलो व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड
केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती
आच्छादन करावे. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे डाळींब बागेत आवश्यकतेनूसार
सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा. नवीन
लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच
खोडाभोवती आच्छादन करावे. कमाल तापमानात होत असलेल्या
वाढीमुळे चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. लहान फळ झाडांना काठीने आधार
द्यावा. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच
खोडाभोवती आच्छादन करावे.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. उन्हाळी
भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेलवर्गीय झाडांना
काठीने आधार द्यावा.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार
पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी.
तुती रेशीम उद्योग
उन्हाळ्यात तुती रेशीम किटक संगोपन करणारे शेतकरी मराठवाडा विभागात
फार तूरळक असून त्यांनी तुती बागेला 7-8 दिवसाच्या अंतराने हलक्या जमिनीत तर भारी
जमिनीत 10-12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचन द्वारे पाणी दिले तर 43
लक्ष लिटर प्रति एकर प्रती वर्ष या प्रमाणे दिवसाला ठिबक संच 5 तास चालेल या
प्रमाणे पाणी द्यावे. रेशीम किटक संगोपन चालू असणाऱ्या शेतकऱ्यांनी 4 दिवस अगोदर
बागेस पाणी द्यावे. ज्या शेतकऱ्यांकडे पानी नसेल अशा शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात 2
महिने किटक संगोपन होवू नये. जमिनीला विश्रांती मिळेल, अंतर मशागतीची कामे करून
घ्यावी. संगोपनगृहाचे बक्करी करण करून घ्यावे.
पशुधन व्यवस्थापन
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र
उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच
बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे.
जनावरांना हिरवा चारा खाऊ खाण्यास उपलब्ध करून द्यावा. हा चारा कुटी करून दिल्यास योग्य
राहील. त्याबरोबर सुका चारा
खाऊ घातल्याने पाण्याची गरज जास्त भासत नाही. पाण्यामुळे पशुंच्या
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार
द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे
मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम,
मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 08/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 25.04.2025
No comments:
Post a Comment