Tuesday 24 May 2022

दिनांक 26 मे रोजी हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 27 मे रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 28 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. मराठवाडयात दिनांक 26 ते 28 मे रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 26 मे रोजी हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 27 मे रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तर  दिनांक 28 मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद  जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 मे ते 04 जून, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कापूस पिकाची लागवड करावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीवर कापूस पिकाची लागवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली 60 ते 100 सेंमी असावी, जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 एवढा असावा. मध्यम ते भारी (30 ते 45 सेंमी खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत तूर पिकाची लागवड करावी. तुरीच्या पिकास चोपन व क्षारयुक्त जमिन मानवत नाही. तुर पिकाच्या वाढीस जमिनीचा सामु 6.5 ते 7.5 योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात. योग्य निचऱ्याच्या मध्यम ते भारी जमिनीत मुग/उडीद या पिकांच्या लागवड करावी. एकदम हलक्या प्रतिची मुरमाड जमिन या पिकास योग्य नाही. पाणी साठवूण ठेवणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. मध्यम ते हलकी, भुसभुशीत, सेंद्रिय पदार्थ आणि कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेल्या जमिनीत भुईमूग  पिकाची लागवड करावी. भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभरीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मध्यम ते भारी, सुपीक, उत्तम निचऱ्याची जमिनी मका पिकाची लागवड करावी.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काळी व कसदार, भुसभुशीत गाळाची, पोयटयाची, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत केळीची मृग बाग लागवड करावी. लागवडीसाठी क्षारयुक्त जमिनीची निवड करू नये. मध्यम ते भारी प्रतीची पाण्याचा चांगला निचरा होणारी, थोडीशी आम्लयुक्त जमिनीत आंबा पिकाची लागवड करावी. चोपन व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करू नये.  वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे मध्यम ते हलकी, उत्तम निचरा होणारी, भरपूर सेंद्रिय पदार्थ व सामू 6.5 ते 8.0 दरम्यान असलेल्या जमिनीत सिताफळ लागवड करावी. भारी, पाण्याचा निचरा न होणारी जमिन निवडू नये.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार भाजीपाला पिकाची निवड करावी. वांगी पिकावरील शेंडा व फळ पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा  क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम  किंवा फेनप्रोपॅथ्रीन 30% ईसी 5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा. काढणी केलेल्या कांदा पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.  

पशुधन व्यवस्थापन

तापमान-आर्द्रता-निर्देशांकामध्ये वाढ झाल्याने दुधाळ जनावरावर हिट ट्रेस (उष्णतेचा ताण) होतो. दुधाळ जनावरांमध्ये तापमान-आर्द्रता निर्देशांकात वाढ झाल्याने दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने कमी यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पिण्यास भरपूर पाणी व कोरडया पदार्थांचे सेवन वाढवावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामुदायिक विज्ञान

इंग्रजी झेंडूंच्या फुलांची भुकटी पाण्यामध्ये उकळून त्यापासून रंग काढता येतो. हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 11%, 2% आणि 2% या प्रमाणात घेऊन वापरता येतो. इंग्रजी झेंडूच्या फुलांपासून रंग काढण्यासाठी व धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला आहे. सुती धागे रंगविण्यापूर्वी, 10% हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून फिका ते गडद केशरी, गडद विटकरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सूर्यप्रकाश या सर्व बाबीसाठी रंगाचा पक्केपणा अतिशय चांगला आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक16 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 24.05.2022

 

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...