प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 14 जून रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 15 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग मागील आठवडयाच्या तूलनेत कमी झालेला आहे.
खरीप पिकांची पेरणी पूरेसा पाऊस होईपर्यंत व पुढील सुचना मिळेपर्यंत
थांबवावी.
विस्तारीत अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक (ईआरएफएस) 19 जून ते 25 जून, 2022
दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे
तर किमान तापमान
सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार दिनांक 19 ते 25 जून , 2022 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे
कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
बीटी कपाशीमध्ये कापूस + तूर (4-6:1 किंवा 6-8:2), कापूस +
सोयाबीन (1:1), कापूस + मूग (1:1) रुंद ओळींमध्ये कापूस +
मूग (1:2), कापूस + उडीद (1:1) ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते. तुरीचे
उत्पादन वाढविण्यासाठी तसेचे जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुर + बाजरी (2:4),
तुर + ज्वारी (3:3 किंवा 2:4), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (1:2 किंवा 2:4) असे ओळीचे
प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पध्दतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो. आंतरपीक
म्हणून मुग/उडीद या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे, ते या पिकांच्या
कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात. भुईमूगापासून
अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती नसल्यास भुईमूग + सोयाबीन (6:2), भुईमूग +
सुर्यफूल (6:2), भुईमूग + तीळ (6:2), भुईमूग + मूग (6:2), भुईमूग + उडीद (6:2),
भुईमूग + तुर (6:2), भुईमूग + ज्वारी (1:1), भुईमूग + कापूस (2:1) या प्रमाणात
पेरणी करून दोन्ही पिकांचे अधिक उत्पादन मिळते. मका या
पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी आंतरपीक महत्वाचे आहे. आंतरपिकासाठी कडधान्ये (उडीद,
मुग, चवळी), तेलबिया (भुईमूग, सोयाबीन), भाजीपाला (मेथी, कोबी, कोथिंबीर,पालक)
इत्यादी पिकांची लागवड करता येते.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन केळी लागवडीसाठी पूर्व
तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. जून्या केळी बागेत आंतर
मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. केळीच्या घडांना काठीचा आधार द्यावा. बागेतील वाळलेली पाने काढून
टाकावीत. नवीन आंबा लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती
पूर्ण करून घ्यावीत. जून्या आंबा बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी
जेणेकरून बागेत वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही. द्राक्ष बागेत पानांची विरळणी
करावी. नवीन सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती
पूर्ण करून घ्यावीत. जून्या सिताफळ बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असलेल्या
शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची गादी वाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकले नसल्यास
टाकून घ्यावे. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या
साहाय्याने पाणी द्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असलेल्या
शेतकऱ्यांनी हंगामी फुलपिकांच्या लागवडीसाठी गादीवाफ्श्यावर बी टाकून रोपे तयार
करावी. बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने
पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून
(ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या
फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
पशुधनास तज्ञ पशुवैद्यकाकडून
घटसर्प, फऱ्या रोग प्रतिबंधक लसी
द्याव्यात. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते
40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार
नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर
आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ
नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
सामुदायिक विज्ञान
मधूमेह असणाऱ्या व्यक्तींनी
रोजच्या आहारात तंतूमय युक्त अन्न पदार्थांचा जसे की, भगर, बाजरी, नाचनी, राजमा,
चवळी, मटकी, सोयाबीन, मेथीची भाजी, राजगिऱ्याची भाजी आणि शेवग्याची पाने यांचा
वापर करावा. त्यामूळे रक्तातील वाढणारी साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 22 / 2022 - 2023 मंगळवार, दिनांक – 14.06.2022
No comments:
Post a Comment