प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 17 जून रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्हयात तर दिनांक 18 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
पेरणी योग्य पाऊस होण्याची वाट पाहावी व पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.
विस्तारीत अंदाजानुसार(ईआरएफएस)मराठवाड्यात दिनांक 17 जून ते 23 जून, 2022 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 24 ते 30 जून 2022 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीनची पेरणी 45 X 5 सें.मी. अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65 किलो बियाणे वापरावे. सोयाबीनची पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते. खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 15 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. बाजरीची पेरणी 45 X 10 ते 15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यंत करता येते. ऊस पिकात आंतरमशागतीची कामे करून तण व्यवस्थापन करावे. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या चार महिन्यापर्यंत वाढ होतील अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये मिरची, घेवडा, कोथंबीर इत्यादी सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद या पिकांमध्ये मका हे आंतरपीक घेऊ नये, त्यामुळे उत्पादनात घट येते.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. तूरळक ठिकाणी पाऊस झाल्यामूळे संत्रा/मोसंबी फळबागेत फुलधारणा झाली आहे. एकसारखी फुलधारणा होण्यासाठी बागेत 13:00:45 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दोन फवारण्या घ्याव्यात. नवीन डाळींब लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. नवीन चिकू लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत.
भाजीपाला
बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिकाच्या लहान झाडांना आधार द्यावा.
फुलशेती
बी टाकलेल्या गादी वाफ्यावर वेळोवेळी आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
चारा पिके
मका या चारापिकाच्या लागवडीसाठी आफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगासफेद, विजय इत्यादी जातींची निवड करावी.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.
तुती रेशीम उद्योग
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतीची बेण्यापासून लागवड केली असेल अशा शेतात मोठया प्रमाणावर 20-25 % पर्यंत तुट राहते. मनरेगा योजनेअंतर्गत दुसऱ्या वर्षात 90 टक्के झाडांची संख्या असणे आवश्यक आहे त्यामुळे तुतीची लागवड बेण्याएवजी 3 महिने वयाच्या रोपांपासून करण्याची महाराष्ट्र शासनाने सक्ती केली आहे. लागवउ केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन अपेक्षित तुती पानांचे उत्पादन मिळते.
सामुदायिक विज्ञान
रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये विविध पानांची (पावडर) भुकटीचा उपयोग करता येतो. जसे, कढीपत्यांची पाने, कोबीची पाने, राजगिऱ्याची पाने, शेवग्याची पाने, हरबऱ्याची पाने आणि बिटाची पाने इत्यादी.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 23/2022 - 2023 शुक्रवार, दिनांक – 17.06.2022
No comments:
Post a Comment