Friday 14 October 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 14 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीसाऱ्यासह मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद नांदेड, परभणी जिल्हयात ; दिनांक 16 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्हयात ; दिनांक 17 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 18 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्हयता तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 मराठवाडयात दिनांक 14  ते 20 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 21 ते 27 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी काढणी न केलेल्या सोयाबीन पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी. पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करावयाचा असल्यास सोयाबीनची मळणी 350 ते 400 आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले खरीप ज्वारी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी काढणी न केलेल्या खरीप ज्वारी पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणी  केलेले कणसे उन्हात वाळवूनच मळणी करावी. मळणी केलेले दाण्यांची साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले बाजरी पिकाची कणसे गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले कणसे व कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी काढणी न केलेल्या बाजरी पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणी  केलेले कणसे उन्हात वाळवूनच मळणी करावी. मळणी केलेले दाण्यांची साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पाऊस झालेल्या ठिकाणी ऊस पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी हळद पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हळदीवर करपा, पानावरील ठिपके, कंदकुज आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 50% 400 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75% 500  ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% 500 ग्रॅम  प्रति एकर स्टीकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी कार्बेंडेंझीम 50% 1 ग्रॅम  किंवा मॅन्कोझेब 75% 3 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50% 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून महिन्यातून एकदा वापसा स्थितीत आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).  कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी जमिनीत वापसा येताच लवकरात लवकर करावी. पेरणी 30X10 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी लहान आकाराच्या देशी वाणासाठी 60 किलो, मध्यम आकाराचे बियाणे 70 किलो तर टपोरे दाण्याच्या काबूली वाणासाठी 100 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. कोरडवाहू करडई पिकाची पेरणी जमिनीत वापसा येताच लवकरात लवकर करावी. पेरणी 45X20 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. गहू पिकाच्या उत्तम वाढीसाठी सुपिक जमिन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असावा. कोरडवाहू गव्हाच्या लागवडीसाठी ओलावा  टिकवून ठेवणाऱ्या जमिनीची निवड करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी बागेत साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्‍य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी बागेत साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.डाळींब बागेत रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5%  किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बगेत फळवाढीसाठी 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी बागेत साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. मिरची पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 50% डब्ल्यूपी 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल 25% 5 मिली किंवा मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

तुती रेशीम उद्योग

तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचे माती परिक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय जमिनीतील असलेल्या अन्नघटक/मुलद्रव्य कमतरता कळणार नाही व त्या व्यतिरिक्त जमिनीचा सामु, कबीचे प्रमाण जमिनीत किती आहे ते कळते, त्यामुळे जमिनीच्या सुपिकतेचा अचुक अंदाज येईल. जमिनीचा सामु आम्लधर्मी असेल किंवा अल्कधर्मी असेल तर झाडांना मुळाद्वारे अन्नघटक शोषण करता येत नाहीत. तेव्हा जमिनीचा सामू 7.0 असावा. भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याच शेतात तूतीची लागवड केली असेल तर शेतातील किटकनाशकाच्या उर्वरीत  शिल्लक राहिलेल्या मात्रे मुळे रेशीम किटक मृत पावतात. अशा जमिनीत तुती लागवड करू नये.

पशुधन व्यवस्थापन

अनेक मार्गाने लम्पी स्कीन डिसीजच्या विषाणूचा प्रसार होतो. त्यापैकी एक म्हणजे चावा घेऊन रक्त शोषण करणाऱ्या किटकवर्गी माशा व गोचीडे होत, परंतू काही शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार घरगूती माशा (नचावा घेणाऱ्या) देखील या विषाणूचा प्रसार करून शकतात. यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (1) गोठ्यामध्ये पडणरी रोगी पशुची लाळ, नाकातील स्त्राव यांचे व एकंदरीत गोठयाचे निर्जंतमकीकरण दैनंदिन करणे या निर्जंतूकिकरणासाठी खालील द्रावण वापरावीत. (अ) 1 टक्के फॉरमेलीन द्रावण अथवा(ब) 2 टक्के सोडीयम हायपोक्लोराईड द्रावण अथवा (क) 3 टक्के फेनाल/फिनाईल द्रावण या तीन पैकी एक द्रावण गोठयात फवारावे. हे द्रावण पशुच्या शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच फवारणी नंतर अर्धातास पशुधनास गोठयामध्ये जाऊ देवू नये. (2)गोठयामध्ये व परिसरामध्ये निर्जंतूकीकरणासोबतच ठरावी कालांतराने वनस्पतीजन्य/रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे उच्चतम दर्जाची गोठयाची स्वच्छता राखावी. 

सामुदायिक विज्ञान

दोन टक्के आवळ्याच्या पानाच्या अर्काचा वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्हया सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ प्रतिबंधित करता येते. आवळ्याच्या पानाच्या अर्कासह 6% सीट्रिक ॲसिड घेऊन  सुती कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा  प्रतिबंध कापडाच्या पाच धुण्यानंतर कमी झाल्याचा आढळून आला. आवळयाच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्ट्यपूर्ण कपडयांना उदा. अवगुठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पट्टया यावर केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक57/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 14.10.2022

 

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...