Thursday 22 December 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होऊन त्यानंतर  किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 23 ते 29  डिसेंबर 2022 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे तर दिनांक 30 डिसेंबर ते 05 जानेवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलावा किंचित कमी झालेले आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात मानकूजव्या आणि मर यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या आळवणीसाठी पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 65 किलो यूरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकात खोडवा व्यवस्थापनासाठी ऊस पिकाची तोडणी झाल्यानंतर शेतातील पाचट जाळू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी बागेस पाणी देणे बंद करावे (बागेस ताण द्यावा). डाळींब बागेत अंबे बहाराच्या नियोजनासाठी जमिनीच्या प्रकारानूसार तिन ते सहा आठवडे बागेस पाणी देणे बंद करावे (बागेस ताण द्यावा). काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकांचे थंडीपासून संरक्षण ‍ करण्यासाठी भाजीपाला पिकास पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

ज्या शेतात मिरची, तंबाखू लागवड केली असेल किंवा भाजीपाला पिकात किटकनाशकाचा वापर केला असेल अशा जमिनीत तुती लागवड करू नये. ज्या जमिनीमध्ये सोयाबीन पिकानंतर तुती लागवड केली असेल अशा जमिनीत कोराझीन सारख्या किटकनाशकाची अगोदर फवारणी केली असेल व रासायनिक खत उदा. युरीया, डिएपी जास्त प्रमाणात दिले असतील तर रेशीम किटकांच्या पोटात तुती पानातून विषबाधा होण्याची शक्यता असते अशा अळ्या मृत पावतात. त्याचबरोबर ज्या जमिनीचा सामु 8.0 किंवा 8.0 च्या वर असेल अशा जमिनीत तुतीची वाढ होत नाही त्या जमिनीत जिप्सम 8 टन/हेक्टर प्रमाणे द्यावे लागेल.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट 2022 पासून चालू आहे व त्याची तिव्रता लसीकरणामूळे कमी झाली असली तरीही आजही  नवीन नवीन पशु व वासरांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी (1) राहीलेल्या पशुधनास तात्काळ लसीकरण करणे. (2) महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या “माझा गोठा-स्वच्छ गोठा” याची माझ्या गोठ्यामध्ये अमलबजावणी व दैनंदिन स्वच्छता आमलात आणणे. (3) गोचीडाचा प्रादुर्भाव रोखणे. गोचीड या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत आहेत. (4) लागण झालेल्या पशुचे विलगीकरण-आजारी पशुस ईतर पशुपासून दुर विलगीकरणामध्ये ठेवणे. (5) रोगी पशु असलेला गोठा सोडीयम हायपोक्लोराईट ने निर्जंतुकीकरण करणे हे उपाय सलग चालू ठेवावेत.

सामुदायिक विज्ञान

सकाळचा नाश्ता एक महत्वाचे जेवण आहे कारण रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळच्या नाशत्यामूळे शरीराला लागणाऱी उर्जा तसेच आवश्यक पौष्टीक मुल्य चांगल्या आरोग्याकरिता आवश्यक आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक77/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 23.12.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...