प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर व
उस्मानाबाद जिल्हयात तर दिनांक 12 जुलै रोजी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना,
विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम
स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 11 व 12 जुलै रोजी
काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 13 व 14 जुलै रोजी
तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 15, 16 व 17 जुलै
रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 14 ते 20 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 जूलै 2023
दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा
वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित वाढलेले आहे.
मराठवाडयात मागील 12 दिवसात ज्या
तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : गंगाखेड, सेलू
; नांदेड जिल्हा : धर्माबाद ; लातूर
जिल्हा : अहमदपूर ; जालना जिल्हा : बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा ; हिंगोली जिल्हा : औंढा नागनाथ,हिंगोली,
कळमनूरी, सेनगाव ; उस्मानाबाद जिल्हा : लोहरा, परांडा, उमरगा ; औरंगाबाद जिल्हा : कन्नड,
पैठण, फुलंब्री ; बीड जिल्हा : धारूर, केज, परळी वैजनाथ, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी) शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये.
पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या
ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी
करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व
खरीप पिकांची पेरणी करता येते. 8 जूलै नंतर भुईमूग,
मुग, उडीद हि पिके घेऊ नये.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पेरणीयोग्य
पाऊस न झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची घाई करू नये, पेरणीयोग्य पाऊस
(75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करावी. कापूस पिकाची लागवड 15
जूलै पर्यंत करता येते. पेरणीयोग्य पाऊस न
झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तूर व मका पेरणीची घाई करू नये, पेरणीयोग्य पाऊस (75
ते 100 मिमी) झाल्यानंतरच तूर व मका पिकाची पेरणी करावी. तुर पिकाची पेरणी 15 जूलै पर्यंत करता येते.
मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. 08 जूलै नंतर मूग/उडीद व भुईमूक ही
पिके घेऊ नये.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन
केळी, आंबा, सिताफळ लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी
करावी. नवीन केळी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
नवीन लागवड केलेल्या केळी बागेस 50 ग्रॅम नत्र व 200 ग्रॅम स्फुरद प्रति झाड खतामात्रा द्यावी. आंबा फळ बागेस 10 ते 15
वर्ष वयाच्या झाडास 500:500:500 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश खतमात्रा द्यावी, तसेच
प्रति झाड 50 किलो शेणखत टाकावे. द्राक्ष बागेतील फुटवे काढावेत. बागेत पानांची
विरळणी करावी. बागेत आर्द्रता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
भाजीपाला
भाजीपाल्याचे
बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून
बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी
भाजीपाला पिकांची लागवड करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या
रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला
पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी.
फुलशेती
फुलपिकाचे
बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या
फुलपिकाची काढणी करून घ्यावी. पाउस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची
पूर्नलागवड करावी.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात
ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव
वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना
कराव्यात.
सामुदायिक विज्ञान
पावसाळयात
हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या,
जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.
ईतर
शंखी
गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या
मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा
चूना टाकून नष्ट कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 29/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 11.07.2023
No comments:
Post a Comment