प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची
शक्यता आहे. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी
तूरळक ठिकाणी तर दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी, दिनांक 27 नोव्हेंबर
रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 24 नोव्हेंबर
रोजी लातूर जिल्हयात तर दिनांक 25 नोव्हेंबर रोजी बीड व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील तिन ते चार
दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात घट
होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं. से. ने
घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 26 नोव्हेंबर ते 02
डिसेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर
15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी संरक्षित पाणी
द्यावे. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून
20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी. रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा
आठवडयांनी दोन कोळपण्या आणि एक खुरपणी करावी. दिनांक 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते
मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात
वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापसाच्या झाडावर 40 ते 50
टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात.
पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि
कवडी कापूस वेगळा साठवावा. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी
हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या
वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40%
+ सायपरमेथ्रीन 4%
400 मिली (पूर्वमिश्रीत
किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून
फवारावे. पुढील
तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता फुलोरा व शेंगा धरण्याच्या
अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकास
आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. दिवसाचे अधिक तापमान जमिनीमध्ये पाण्याची
कमतरता असल्यास तसेच पिकाची फुलोरा/शेंगा भरणे या अवस्थेमध्ये तूर पिकात कोरडी
मूळकूज या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येतो, याच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा
किंवा बायोमिक्सची 200 ग्रॅम/200 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे रोगग्रस्त
भागामध्ये आळवणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी क्रेसोझीम मिथायल 50% याची 0.1% किंपर कॉपर ऑक्झीक्लोराईड 50% ची 0.25% याप्रमाणे आळवणी करावी. तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25%
20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबर पर्यंत करता येते पेरणी 60X30
सेंमी अंतरावर करावी.
पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी. मका
पेरणी करतांना 75 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे
आणि 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावे, याकरिता 289 किलो 10:26:26 +
युरिया 100 किलो किंवा 500 किलो 15:15:15 किंवा 375 किलो 20:20:00:13 किंवा युरिया
163 किलो + 469 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 126 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति
हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि 163 किलो युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक
महीण्यांनी द्यावा.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील तीन दिवस हवामान कोरडे
राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या केळी बागेत तण व्यवस्थापन करून
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. फुलोरा ते फळधारणा अवस्थेत असलेल्या द्राक्ष
बागेत तणांचे नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड
केलेल्या सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार
असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. आंबा
फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. आंबा बागेत फुलधारणा
व्यवस्थित होण्यासाठी 13:00:45 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अंतरमशागतीची
कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अंतरमशागतीची कामे
करून तण नियंत्रण करावे. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार
असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन
व्यवस्थापन
थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण
करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे,
त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या
शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत
गोठ्यात बांधावेत.
सामुदायिक विज्ञान
शरीरातील सर्व कामे व्यवस्थीत
करण्याकरिता व आपल्या ऱ्हदयाचे ठोके व्यवस्थीत राहण्यासाठी मिठाची गरज असते.
मिठामूळे चव चांगली येते पण मिठाचा वापर कमी करावाव. कारण जास्त मिठाचा वापर केल्याने रक्तदाब, ऱ्हदयरोग होतात.
जास्त मिठामूळे हाडातील कॅल्शीयमचे शोषण होते. जागतिक आरोग्य संघटना यांनी 5 ग्रॅम
पेक्षा कमी मिठाचा वापर करावा असे सुचविले आहे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 67/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 21.11.2023
No comments:
Post a Comment