हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 23 मे रोजी छत्रपती संभाजी नगर,
जालना, परभणी जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 24 मे रोजी परभणी, बीड, हिंगोली,
धाराशिव जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 25 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर
जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 26 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर
जिल्हयात काही ठिकाणी तर दिनांक 27 मे रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर
व धाराशिव जिल्हयात काहि ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी
40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक
23 मे रोजी बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात, दिनांक 24 मे रोजी
लातूर व नांदेड जिल्हयात, दिनांक 25 मे रोजी बीड व धाराशिव जिल्हयात, दिनांक 26
मे रोजी धाराशिव जिल्हयात, दिनांक 27 मे रोजी
छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 23 ते 27
मे दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 23 ते 29 मे 2025
दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 30 मे ते 05 जून 2025 दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे.
संदेश : प्रादेशिक
हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार मराठवाडयात तूरळक ठिकाणी
वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग राहून मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची
शक्यता असल्यामूळे काढणीस असलेल्या उन्हाळी पिकाची, फळाची व भाजीपाला पिकाची काढणी
लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत, पिवळ्या चिकट सापळ्यांचा
पिकात वापर करावा, रासायनिक कीटकनाशकामध्ये व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड
17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति
10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या
उन्हाळी तीळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सोयाबीन
पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत
अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत
सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची,
सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान
असणे गरजेचे आहे. खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन
निवडावी. बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम
जमीन निवडावी. हळद लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत, भरपूर सेंद्रिय
पदार्थ असलेली जमिन निवडावी, तसेच जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा अशी बहू वार्षिक
तणे असू नयेत. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा आम्ल
विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 असलेल्या जमिनीत हळदीचे पिक उत्तम येते.
फळबागेचे व्यवस्थापन
अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत 00:52:34 1.5 किलो प्रति
100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी पावसाची उघाड बघून करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी
बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघाड बघून करावी. लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा.
भाजीपाला
खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो,
कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन
निवडावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी. उ भाजीपाला (मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% +
फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम
ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
बदलत्या तापमान कमी जास्त होणे व आर्द्रता
वाढणे यामुळे हवामानात रेशिम किटक वाढीस समस्या निर्माण होतात संगोपनगृहात जुनी शेडनेट,रॅक, जमीन, यावर साठलेल्या
धूळीमार्फत होणाऱ्या प्रादुर्भावामुळे किटकास ग्रासरी किंवा प्लॅचरी रोग प्रादुर्भाव
होण्याची दाट शक्यता असते! किटकसंगोपन चालू असलेल्या शेतकऱ्यांनी 22 ते 28 अंश सेल्सिअस
तापमान राहील व आर्द्रता 85 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू देऊ नये! कात टाकताना चुना पावडर व कात उठताना
वीजेचा पावडर चा धुरळणी साठी वापर करावा.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर
पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि
5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच
व्यवस्थापन करावे.
तुरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो
चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या
ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव
किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर
ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी
झाडाच्या आडोश्याला थांबू नये.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 16/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 23.05.2025
No comments:
Post a Comment