Monday, 10 November 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 14 ते 20 नोव्हेंबर, 2025दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : सोयाबीन पिकची काढणी व मळणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. फवारणीची कामे स्वच्छ व कोरड्या हवामान असतांना करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.

तुर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास आवश्यकतेनूसार हलके पाणी द्यावे.

रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी.

रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.

बागायती गहू वेळेवर पेरणीचा कालावधी हा 01 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर आहे. वेळेवर पेरणीसाठी त्र्यंबक, गोदावरी, फुले समाधान इत्यादी वाणांपैकी निवड करावी. गव्हाची पेरणी करतांना 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे, याकरिता 192 किलो 10:26:26 + युरिया 67 किलो किंवा 109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 66 किलो किंवा 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 109 किलो युरिया प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत केळी झाडांना माती लावावी व काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. केळी बागेत 50 ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा देण्यात यावी. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी 13:00:45 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा फळ बागेत भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी 300 मेश गंधकाची धूरळणी करावी. आंबा बागेत किडीच्या व्यवस्थापनासाठी  किटक नाशकाची फवारणी करावी.

द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर फवारणी केली नसल्यास द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. द्राक्ष बागेत पानाची विरळणी करून रोगग्रस्त पाने काढून टाकवीत.

काढणीस तयार असलेल्या सिताफळांची काढणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

भाजीपाला

पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकास खतमात्रा देण्यात यावी.

फुलशेती

आष्टूर व जिलार्डीया या फुलपिकाची लागवड करण्यासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी बी टाकावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.

पशुधन व्यवस्थापन

बदललेल्या ऋतूमानानूसार व हवामान बदलानूसार दूध उत्पादनावरील पशूधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, त्यासाठी थंडीपासून/थंड तापमानापासून/थंड वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षणासाठी खिडकी व दरवाज्यांना गोण्याचे पडदे लावावेत. पशुधनाला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या बसण्याच्या ठिकाणी काड/पेंढा/मॅट वापरून जमिनीतील थंडावा कमी करावा. दिवसा सूर्य प्रकाशात सहवास लाभणे अत्यंत गरजेचे आहे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक65/2025-2026    मंगळवार, दिनांक – 11.11.2025

 

No comments:

Post a Comment