हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,
मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी हिंगोली, नांदेड
व जालना जिल्हयात तर दिनांक 21 जून रोजी छत्रपती संभाजी नगर,
बीड, जालना, लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी
वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील
पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील
दोन दिवस कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर त्यानंतर फारशी
तफावत जाणवनार नाही तर पुढील तीन ते चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत
जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 26 जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा , कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान
तापमान सरासरीएवढे व दिनांक 26 जून ते 03 जुलै 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची
शक्यता आहे.
संदेश : शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी)
झाल्यानंतरच पेरणी करावी, पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी
करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून)
पेरणी करता येते.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीनची पेरणी 45X5 सें.मी.
अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करता येते. सोयाबीन पेरणीसाठी हेक्टरी 65
किलो बियाणे वापरावे. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिन 37.5 % + थायरम 37.5
% (मिश्र घटक)
या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम किंवा ॲझोक्सीस्ट्रोबीन 2.5 टक्के + थायोफॅनेट मिथाईल
11.25 टक्के + थायोमिथॉक्झाम 25 टक्के एफ एस 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बिजप्रक्रियेनंतर थायामिथोक्झाम 30% एफएस 10 मिली
प्रति किलो ग्रॅमची बिजप्रक्रिया करावी. वरील बिजप्रक्रियेनंतर बियाण्यास
रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची
(पी.एस.बी.) 250 ग्रॅम प्रति 10 किलो किंवा 100 मिली/10 किलो ग्रॅम (द्रवरूप असेल
तर) याची बिजप्रक्रिया करावी व नंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर
पेरणी करावी. बिजप्रक्रियेसाठी व.ना.म.कृ. वि. परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा
(रायझोफॉस) 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात वापर करता येतो. सोयाबीन
पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील
ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. पेरणीपूर्वी
सोयाबीन बियाण्याची तपासून पाहावी, उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त
असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे. खरीप
ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 12.5 सें.मी.
ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो
संकरित व 10 किलो सुधारीत वाणांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीच्या पेरणीपूर्वी
गंधक 300 मेश 4 ग्रॅम किंवा थायरम 75 टक्के 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रिया करावी. तसेच इमिडाक्लोप्रीड 48 टक्के एफएस 14 मिली किंवा
थायमिथॉक्झाम 30 टक्के 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.
ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति
किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी.
बाजरीची पेरणी
45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त
खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो
बियाणे वापरावे. बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास मेटालॅक्झील 35 % एसडी 6 ग्रॅम
प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. 250 ग्रॅम ॲझोस्पिरीलम 10 किलो
बियाण्यास चोळून पेरणी करावी किंवा शेवटी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू
(पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यावर
बिजप्रक्रिया करून पेरणी करता येते. ऊस पिकावर खोड
किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. हळद पिकाची
लागवड करून घ्यावी. हळद लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20
मिली + कार्बेंडेझीम 50 टक्के 10 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली
+ डायथेन एम-45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100-120 किलो बियाण्यास
बिजप्रक्रिया करावी.बियाणे 10 ते 15 मिनिट द्रावणात बूडवून ठेवावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर
संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय
नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. अंबे बहार संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघाड
बघून करावी. अंबे बहार
संत्रा/मोसंबी बागेत फळगळ व्यवस्थापनासाठी,
चिलेटेड झिंक 500 ग्रॅम + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम 100 लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब नविन
बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड
करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. मृग बहार धरलेल्या डाळींब बागेत तेल्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी
रोगनाशकाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती,
क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. चिकू बागेत
तणांचे नियंत्रण करावे.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला
(वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी
टाकावे. भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे
आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकाची
रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी
वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम उद्योगात वर्षभर १२ लोकांना रोजगार
उपलब्ध होतो. चीन देशात १ दश लक्ष लोकांना तर भारतात ७.९ दश लक्ष लोकांना रेशीम उद्योगात
रोजगार उपलब्ध होतो. खेड्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हि काळाची गरज असून
शेतीवर आधारित पशुपालन, कुकुटपालन, शेळी, मेंढी, दुग्ध व्यवसाय आणि रेशीम उद्योगामुळे शेतीची अर्थकारण बळकट होण्यास
मदत मिळते. शहराकडे रोजगारासाठी होणारे अथलांतर थांबवण्याची क्षमता रेशीम उद्योगात
आहे. समाजात१२ बलुतेदाराबरोबर विणकर, बूनकर, रंगारी, कातारी याना पण
रेशीम उद्योगामुळे खेड्यात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात वातावरणातील
आर्दता, तापमानातील बदल, पाणी साचणे, चिखल होणे, माश्या व इतर कीटकाचा प्रादुर्भाव दिसून येतो, या कारणाने पशुधनाचे आरोग्य बिघडते, त्यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे. पशुधनासाठी सुरक्षित व स्वच्छ
निवाऱ्याची व्यवस्था करणे, गोठ्याच्या परिसरात
पाऊसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, दर 15 दिवसाने गोठ्याचे
पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने निर्जंतुकिकरण करावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 24/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 20.06.2025
No comments:
Post a Comment